शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126)
माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी.
माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं.
"खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते.
शेतीचे प्रश्न -
👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत.
👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं.
👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच..
👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं.
👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं.
👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं.
👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर्थिक मानसिक तणावाखाली राहणं.
👉🏻 खेळत्या भांडवलाचा तुटवडा असणं. त्यामुळे सावकारी पाशात अडकत जाणं.( प्रतिमहा 5% दराने कर्ज घ्यावं लागतंय)
👉🏻 नोकरदार वर्ग, शेतकरी वर्ग यांच्या उत्पन्नातील, जीवनमानातील तफावत वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचतोय.
👉🏻 बहुतांश शेतकरी कोर्टकचेरीत अडकलेला असतो.( बांधाचा वाद, रस्त्याचा वाद, मालकी हक्काचा वाद, खातेफोड....)
शेती हा कसलीही शाश्वती न देणारा, बेभरोशी, आतबट्याचा व्यवसाय झाला आहे.
निवडणुकीच्या केंद्रस्थानी धर्म,जात, मंदिर यापेक्षा शेतीविषयक धोरणं चर्चेला यावीत. दैनंदिन जीवनातील प्रश्न Prime time च्या चर्चेत असावेत. अगदी तळातील शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी सरकारच्या शेतीविषयक धोरणांवर चर्चा करावी. हे होऊ लागेल तेव्हा बदलाची पहाट उगवेल.
आपण आशावादी राहून त्यादिशेने प्रयत्न (लोकशिक्षण) करत राहू.
_सिद्धेश्वर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा