मुख्य सामग्रीवर वगळा

आजीवन ऐशो आरामाची आखणी - डब्ल्यू समरसेट मॉम (अनुवाद - विलास साळुंखे )

आजीवन ऐशो आरामाची आखणी - डब्ल्यू समरसेट मॉम (अनुवाद - विलास साळुंखे )



विल्सन बँकेत कामाला असतो. पत्नीच्या निर्णयानंतर त्याला बांधून ठेवेल असे कोणतेही पाश राहत नाहीत. पूर्वी कधीतरी कॅपरी बेटाचे सौंदर्य पाहून तो प्रभावित झाला होता. 
वयाच्या 35 व्या वर्षी तो निर्णय घेतो सर्व सोडून कॅपरी बेटावर कायमचा स्थानिक होण्याचा. निसर्ग सौंदर्य पहायचं, पोहायचं,वाचन करायचं... मनाप्रमाणे जगायचं.

पुढील पंचवीस वर्षे पैसे पुरतील इतकी तो तजवीज करून ठेवतो आणि मग पुरेपूर जीवन उपभोगल्यानंतर साठव्या वर्षी आत्महत्या करायची असं त्याचं नियोजन असतं.

25 वर्ष तो त्याच्या मनाप्रमाणे जगतो, पण साठाव्या वर्षी त्याचा निर्धार ढळतो. त्यानंतर पुढील 6 वर्षे तो जगतो, ती एक शोकांतिका ठरते .(जगाच्या दृष्टीने )

कथेतील काही उतारे 

👉🏻मोकळा वेळ मिळणं हा माणसाला मिळू शकणारा एक अमूल्य असा ठेवा आहे आणि लोक इतके मूर्ख असतात, त्यांना कळत नाही तो कायम जपला पाहिजे; इतकंच नाही तो मिळवणं हेच त्यांचं ध्येय असलं पाहिजे. कामकाज करणं? लोक कामासाठी काम करतात. त्यांच्या मेंदूला हे कळत नाही की, कामकाज करण्याचं फक्त एकच प्रयोजन असू शकतं ते म्हणजे आराम-स्वस्थता-मोकळा वेळ मिळवणं.

👉🏻सर्व गोष्टींचा त्याग करून सुखी जीवन जगण्यासाठी मिळणारा सर्व प्रकारचा आनंद आणि आराम मिळवून देणारं पुरेसं उत्पन्न माझ्याकडे नसणं, हे अगदी मूर्खपणाचं ठरलं असतं. मला माझी स्वत:ची जागा हवी होती, माझी काळजी घेणारा एक नोकर तसेच तंबाखू, खायला चांगलंचुंगलं अन्न, अधेमधे वाचण्यासाठी पुस्तकं आणि ऐनवेळी अचानक निर्माण होणाऱ्या आणीबाणीच्या खर्चासाठी पुरेसे पैसे हवे होते. मला नेमकी किती रक्कम हवी होती याचा मला नीटसा अंदाज आलेला होता. माझ्या लक्षात आलं की, पंचवीस वर्षे आरामात जगता येईल एवढी रक्कम माझ्याकडे होती. 

👉🏻लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तरी त्याला राग येत नसे. त्याला लोकांचा सहवास आवडायचा, परंतु त्यांच्या जास्त जवळ न जाता तो दूरच राहायचा. जरी तो काटकसरीने राहायचा, तरी स्वतःच्या सुखसोई आणि आरामाची सोयही करायचा. तो कोणाचेही कधीही एक पैसा देणे लागत नव्हता.

👉🏻मला वाटतं, त्याने निर्धारपूर्वक असं ठरविलं होतं की, त्याच्या जीवनातील वैयक्तिक स्वातंत्र्यावर आणि सुखावर कोणत्याही कारणामुळे कधीही विपरीत परिणाम होता कामा नये. त्याच्या मनात रुजलेली सर्वश्रेष्ठ लालसा ही फक्त येथील निसर्गसौंदर्यासाठीच होती आणि आयुष्यातील साध्या, सरळ, नैसर्गिक गोष्टीतील आनंद सहजपणे मिळविण्याकडेच त्याचा कल होता. एका अर्थी तुम्ही असंही म्हणू शकला असता की, त्याचं जगणं हे निखालस स्वार्थी होतं. होय, ते तसं होतं, त्याचा कोणालाही काहीही उपयोग नव्हता, परंतु याउलट हेही खरं होतं की, त्याने कधी इतर कोणाला त्रासही दिला नव्हता.

👉🏻मी फक्त हाच विचार करीत होतो की, आजपासून दहा वर्षांनी - एखाद्या अचानक आलेल्या आजारामुळे त्याच्या आयुष्याची दोरी त्याआधीच तुटली नसली तर आवडणारे हे जग सोडून जाण्यासाठी त्याने जाणीवपूर्वक स्वत:ला कसं संपविलं असतं? माझ्या मनात येऊन गेलं, मृत्यूबद्दलचा हा विचारच, जो त्याच्या मनातनं कधीही दूर गेला नसणार, त्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण उत्साहाने जगण्यासाठी त्याला सतत बळ देत असणार!

👉🏻पंचवीस वर्षं अत्यंत सुखानंदात घालविल्यावर त्याची प्रकृती आणि नैसर्गिक गुणविशेष जरा कमजोर झाले असू शकतील. त्याचा स्वभाव, त्याची मानसिक शक्ती क्षीण होण्याची शक्यता त्याने गृहीत धरली नसावी. माणसाची इच्छाशक्ती आणि काम करण्यासाठी लागणारी ईर्षा आणि ऊर्जा - यांचा वापर करण्यासाठी जीवनात काहीतरी अडचणी व अडथळे येण्याची गरज असते. जर इच्छाशक्तीला काहीही विरोध झाला नाही, हवे ते मिळविण्यासाठी काही प्रयत्नच करण्याची गरज पडली नसेल कारण आपले ईप्सित जवळ म्हणजे हात पसरताच आपल्याला मिळू शकले तर माणसाची इच्छाशक्तीच दुबळी होऊन जाते. जर तुम्ही कायमच सपाटीवर चालत राहिलात तर चढाव चढण्यासाठी लागणारी स्नायूंची ताकद कमजोर होऊन जाते. ही निरीक्षणे क्षुल्लक वाटतील; पण ती खरी आहेत. प्रदीर्घ काळाच्या सुखानंदासाठी व आरामदायी आयुष्यासाठी त्याने केलेल्या तयारीमुळे त्याच्याकडील पैसे संपल्यानंतर स्वत:चा स्वहस्ते शेवट करण्यासाठी लागणारा निर्धार त्याच्याकडे उरला नव्हता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...