कुंभमेळ्यात भैरू - उत्तम कांबळे (020325)
2003 साली नाशिक शहरात कुंभमेळा भरला होता, प्रस्तुत लेखक भैरू म्हणून या कुंभमेळ्यात महिनाभर फिरले,वावरले.त्यांना आलेले अनुभव, त्यांना दिसलेला कुंभमेळा या पुस्तक रूपात तीस-पस्तीस लेखा तून मांडlला आहे.
साधू म्हणजे काय?
दाढी आणि केस वाढलेत, वाढलेल्या केसांना तेलपाणी करून, नियमित स्वच्छ न केल्याने ते राठ झालेत. मग त्यांना जटा म्हणायचं. अंगावर, चेहऱ्यावर राख फासली आहे. भगव्या रंगाचं अर्धवस्त्र अंगावर आहे, हातात कमंडलू आणि एक झोळी आहे. असं असलं की झाला साधू.
हटयोगाच्या नावाखाली कोणी हात वर करून उभा आहे, कोणी ऐका पायावर उभा आहे, कोणी काट्यांमध्ये झोपून आहे.... शरीराला यातना देण्यात कसलं आलंय अध्यात्म?
शाहिस्नान केल्याने पाप धुतलं जातं, पुण्य लाभतं, रोग बरे होतात अशी श्रद्धा (आभास) आहे. मग कर्माच्या सिद्धांतच काय? कर्मानुसार फळ मिळत अशी धार्मिक लोकांची मान्यता आहे मग वाईट कर्म करून शाहिस्नान केल्यास तो व्यक्ती पवित्र होतो का?
भगवा रंग तर त्यागाचा, वीरक्तीचा आहे ना?मग स्वतःला साधू, संत म्हणवणारे आखाड्याचे प्रमुख मानापानावरून हमरीतुमरी वर का येतात?
जवळपास प्रत्येक कुंभमेळ्यात चेंगराचेंगारी होऊन भाविक दगावतात, नुकत्याच झालेल्या प्रयागराज कुंभमेळ्यात शेकडो भाविक जायबंदी झाले. नदीतील पाणी दूषित झाल्याचे व्हिडीओ आले पण भाविक जायचे थांबले नाहीत.
( माझे वयोवृद्ध आई-वडीलही जाऊन आले.सरकार पुरस्कृत मीडियाच्या भडीमारमुळे गेले असावेत. जे की जवळ इंद्रायणी नदी असून तिथे कधी गेल्याचे माझ्या माहितीत नाही. आळंदीतील इंद्रायणीच्या पाण्याचा दर्जा आणि प्रयागराज च्या गंगेचा दर्जा एकच आहे हे त्यांना कसं पटवावं?)
तुकाराम महाराज, गाडगे महाराज,तुकडोजी महाराज यांचा विचार पोहचवण्यास वारकरी संप्रदाय कमी पडतोय का?
पाप पुण्य या सापेक्ष कल्पना आहेत. कोणत्याही नदीत अंघोळ केल्याने वा ना केल्याने काही फरक पडतं नाही. निर्मिक शी संवाद साधण्यासाठी कोणत्याही पूजा, यज्ञ, विधी वा मध्यस्थीची, कुठे जाण्याची गरज नाही. तो प्रत्येक जिवाच्या ठिकाणी वास करतोय.
गर्दीच्या ठिकाणी जाण टाळा.....
_सिद्धेश्वर
पुस्तकातील उतारे
👉🏻 धार्मिकतेच्या नावाखाली भरवल्या जाणाऱ्या या सोहळ्यातून घेण्यासारखे काहीच नाही असे माझे मत होते आणि आजही आहे. पाप, पुण्य, अध्यात्म या साऱ्या कल्पना भ्रामक आहेत हे जरी खरे असले तरी कुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांच्या संख्येने यंदा विक्रम केला.
👉🏻 सार्वत्रिक पातळीवर होणारी प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी शहाणपणाची आणि सत्य असतेच असे नाही.
👉🏻 आपण बहुतेक वेळेला दृश्य पाहतो आणि ती जन्माला घालणाऱ्या कळा,वेळा आणि मुळे विसरून जातो.
👉🏻 सरकार धर्म कल्याणाच्या बाबतीत सशा च्या वेगाने तर जनकल्याणाच्या बाबतीत कासवाच्या वेगाने कस धावत?
👉🏻संत तुकोबारायांचा एक अभंग आहे. 'काय पालटले सांग पहिले... पाप गेल्याची काय खूण...' कुंभमेळ्यात अंघोळ करून पापमुक्त होऊन गेलेल्यांनी कोणत्या खुणा सोडल्या... असं तुकोबा विचारायचे....
👉🏻गर्दी खेचण्याचे नवनवीन मार्ग हाताळले जात आहेत. भव्यदिव्य मंडपाकडंही गर्दी आकर्षित होते... नुसती फळेच खाणाऱ्याकडंही ती आकर्षित होते... स्वतःचं वय दोन-तीनशे वर्षं असल्याचा दावा करणाऱ्याकडंही होते गर्दी... झगमगाटाकडंही ती वळते... खांद्यावर माकड, कुत्रं घेऊन बसणाऱ्याकडंही ती सहज वळते... गर्दी होते कधी कधी निरक्षर... तर वागते कधी कधी आंधळ्याप्रमाणं... गर्दीचे नाना नमुने बघायचे असतील तर जा कुंभमेळ्यात, पण स्वतःचं अस्तित्व मात्र जपून ठेव असं भैरू मनातल्या मनात सांगतोय... गर्दी कधी कधी माणसाला अस्तित्वहीन, प्रज्ञाहीन करते म्हणून...
👉🏻तुकारामांनी स्नान करताना शरीराबरोबर मन् स्वच्छ करायला सांगितलं... महात्मा फुल्यांनी स्नानावर अखंड लिहिलाय... अंघोळीमुळं पुण्य लाभत असेल तर ते सर्वप्रथम माश्यांना, सुसरींना लाभलं पाहिजे असं कबीरणं म्हटलंय.
👉🏻गर्दी माणसाला अंगाखांद्यावर घेते आणि चिरडूनही टाकते; नाही! गर्दी शोकसभेसाठी उभीही राहते आणि जीव वाचवण्यासाठी धावतही सुटते; नाही !! गर्दी स्नानासाठी माणसाच्या अंगावर पाय देऊनही जाते; नाही!!! गर्दी माणसाच्या स्मारकासाठी वर्गणीही जमवते आणि त्याच्या मृत्यूला जबाबदारही ठरते; नाही... पुण्य मिळवण्यासाठी गर्दी एका अर्थानं युद्धही करते; नाही... गर्दी सुरक्षेचं कडं तोडून कुठं पळत होती आणि त्यापैकी काही जण कुठं पोहोचले...? न परतीच्या वाटेवर....
👉🏻मध्यमवर्गीय माणूस आपला कोणताच इतिहास मागं सोडत नाही असं म्हणतात, कारण त्या बिचाऱ्याच्या आयुष्यात इतिहास घडवण्यासारखं असतंच काय ?... नऊ रुपये तीस पैसे महागाई भत्ता वाढला की तो अठरा महिने आनंदात असतो... चहाची मेजवानी देतो. देऊन देऊन तो देणार काय?
👉🏻दुःख पचवून जगण्याची कला अवगत करणं, शहाणपणाने दुःख विसरणं यालाच तर जगणं म्हणतात.
👉🏻रोगप्रतिबंधक उपाय म्हणून... सगळ्यांच्या ओठावर आता एकच शब्द येतोय... शाहीस्नान... विक्सच्या डबीला नऊ रुपये तरी खर्चावे लागतात; पण स्नानासाठी शून्य पैसे... सर्व रोगांवर रामबाण उपाय... शाहीस्नान... जोरसे बोलो शाहीस्नान... गर्वसे बोलो शाहीस्नान....
👉🏻 दृष्टीशिवाय डोळा आणि वादा शिवाय कुंभमेळा असूच शकत नाही....
👉🏻आता मात्र खरोखरच कॉलम संपला... पुन्हा भेट? माहीत नाहीय... जमलेच तर रेशनच्या रांगेत, शाळेसमोर डोनेशन भरायच्या रांगेत, बससाठीच्या रांगेत... सातबाराचे उतारे काढण्याच्या रांगेत... गणेशोत्सवाचे देखावे पाहण्याच्या गर्दीत... मतदानासाठीच्या रांगेत... गर्दीतले धक्के मनावर न घेता हातात हात घालून चालू या... एवढं सांगण्यासाठीच होतं भैरूचं हे पुनरागमन... पुढची भेट अर्थातच माहीत नाही...; पण होणार नक्की... प्रवाहातले दोन ओंडके परस्परांना भेटत नाहीत ? पण आपण ओंडके कुठं आहोत... आपण प्रयत्न करू या...
👉🏻त्यांच्या अंगावर भगवे वस्त्र म्हणून ते साधू. काही जण स्वतःचं माहात्म्य सिद्ध करण्यासाठी प्रचंड क्लेश करून घेत आहेत... काही जण स्वतःची जुनी छायाचित्रं दाखवत आहेत... काही जण 'भारत का सबसे बडा तांत्रिक' अशी स्वतःच स्वतःची जाहिरात शहरातल्या भिंती रंगवून करताहेत... सगळ्या जबाबदार आखाड्यांनी एकत्र येऊन भगवी वस्त्रं वापरण्याविषयी काही नियम, काही संकेत करावेत... निदान पेटंटसाठी अर्ज तरी करून ठेवावा. नाही तर, 'काय भुललासी वरलिया रंगा...' असंच काही तरी होईल...
👉🏻रॉय किणीकर यांच्या दोन-चार ओळी आठवल्या...
हा देह तुझा, पण
देहातील तू कोण ?
हा देह तुझा, पण
देहाविण तू कोण ?
भैरूला क्षणभर वाटलं या ओळी या चमत्कारिक माणसांना ऐकवाव्यात... पण गर्दीच्या महापुरामुळं ते शक्य होणार नव्हतं... भैरूचा आवाज तिथपर्यंत पोहोचणार नव्हता... साऱ्यांनी एकासुरात म्हटल्यास मात्र शक्य आहे... तसं झालं तर आपण शरीराला क्लेश कशासाठी करून घेतोय मोक्षासाठी, मोहावर विजय मिळवण्यासाठी की भाकरी मिळवण्यासाठी हे तरी कळेल....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा