ठसन वाचून झाली. मी निःशब्द झालोय. मनात निराशा दाटून आलीत. ठसन चा अनुभव शब्दातीत आहे. मनात कालवा कालव होते.... म्हणजे नेमकं काय सांगता येत नाही, हा अनुभव ज्याचा त्याने घेतला पाहिजे. अनुकंपा, संवेदनशीलता असणाऱ्या नसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ठसन वाचावी. समाज वास्तव, दुनियादारी, आपल्या परीघाबाहेर च जगणं समजत.
गिरणगावच्या अरुणोदय चाळीची, तिथल्या शोषित माणसांची, सुखवास्तु कुटुंबाने न पाहिलेल्या खऱ्या मुंबईची ही गोष्ट आहे. मुंबईतील गिरणी कामगार चाळीमध्ये राहायचा. ह्या चाळीची एक संस्कृती होती. त्या लोकांचा दैनंदिन संघर्ष, संस्कृती, स्वप्न याची जाण ठसन मुळे होते.
त्यांची चूक नसताना, क्षमता, पात्रता असूनही चाळीतील कित्येक मुला मुलींची स्वप्न करपून गेली, केवळ जन्माचे कैदी असल्यामुळे.
हे भयाण वास्तव अंगावर येत. यांचं अभावग्रस्त जीवन पाहिलं की स्वतःची शरम वाटायला लागते. माझ्याकडे संसाधनांची विपुलता असूनही केलेला माज आठवतो. किती किती गोष्टी मी granted धरल्या.....
पान क्रमांक ९५ वर आलोय.... रोहिणीच्या विचाराने माझा कंठ दाटून आलाय. डोळे डबडबलेत. मी पुस्तक उलटं करून ठेवलं. लाईट बंद केली आणि समोरच्या भिंती कडे पाहत बसलो....
जे रोहिणीच्या बाबतीत झालं तेच मयुरीच्या बाबतीत झालं. पुरुषी मानसिकतेने मयुरीच्या स्वप्नांचा खून केला. एक चांगला खेळाडू खुरडून टाकण्यात आला. Life is not fair....
पची मोठा क्रिकेटर होऊ शकला असता पण....
असे असंख्य खेळाडू, कलाकार संधीच्या आभावामुळे नामशेष झाले... ठसन मुळे हे वास्तव जाणवतं, मन खंतावत.
पहाटे चार ला उठून चपात्या लाटणारी मयुरी, स्मशानात जाऊन अभ्यास करणारा चेंबल्या डोळ्यासमोर आले की...... काय बोलाव? किती ही अभावग्रस्तता.
'ठसन' कादंबरी दोनशे वर्षांनीही वाचली जाईल.या अभिजात साहित्याचा आस्वाद नक्की घ्या.
💡पुढे स्पॉईलर आहे.
प्रसंग एक
चेंबल्या आणि हवा ही दोन पोरं प्रेतावरील पैसे गोळा करतायेत. मिळालेल्या पैशातून वडापाव खायला जातात. भरपूर पैसे मिळाल्यावर त्यांना डोसा वगैरे खायचा आहे.
हवा चा बाप लाल सलाम वाला आहे . त्याला मिल मधून काढल आहे. हवा ची आई धुणं भांडी करून घर चालवते.
चेंबल्या आणि हवा हे जिवाभावाचे मित्र.
बँकेत नोकरी मिळेल या आशेने चेंबल्या, हवा चाळीतील पोरं खो खो खेळतायेत. जिल्ह्याला दोघांची निवड होते पण......
खो खो खेळताना मॅच रंगात आलेली, चेंबल्या पोल मारायला गेला आणि पोलच तुटला. चेंबल्या जायबंदी झाला. त्याचा खो खो कायमचाच सुटला.....
आणि बँकेतील नोकरीचे स्वप्न ही विरून गेलं .
( या ठिकाणी खो-खो मॅच चे केलेले वर्णन मनात थ्रिल निर्माण करतं. सामना आपल्यासमोर सुरू आहे, हवा बेभान होऊन वाचकासमोरून धावतोय असा आभास होतो.)
प्रसंग दोन -
अरुणोदय च्या टीमला जिंकण्यासाठी दोन बॉल दोन रन हवे होते. अंधार पडू लागलेला. बॉल एका बिळात गेला. हवा काढायला गेला तर चिचुंद्री त्याच्या बोटाला चावली. हवा पुन्हा बॉलिंग करू शकला नाही.
मन हेलावून टाकणारे, दुनियादारी समजावणारे असे अनेक प्रसंग कादंबरीत आहेत.वेगळी अनुभूती देणारी, trance मध्ये घेऊन जाणारी ठसन नक्की वाचा.
ग्रॅज्युएट - वडापावची गाडी चालवणारा
सोन्या मोन्या - साऊंड सिस्टीम वाला
पची - रमी क्लब चालवणारा
चेंबल्या - भूषण कदम
हवा - वैभव पवार
बीबीसी - खोपडे काकू
काठी - बापाची पॅन्ट चोरणारा
व्हिजन - ज्ञान देणारा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा