"ज्यांना इतिहास समजणार नाही, त्यांना वर्तमान समजणार नाही, ज्यांना वर्तमान समजणार नाही, त्यांना भविष्य घडवता येणार नाही"
__कॉ. गोविंद पानसरे
कॉम्रेड गोविंद पानसरे सर यांच्या कार्याची धावती ओळख करून देणार लीडर हे पुस्तक नुकतच वाचलं. पानसरे सर यांचे नाव माहीत होतं. ब्राह्मण्यवादी सनातनी विचारसरणीने कॉम्रेड गोविंद पानसरे सर यांची हत्या घडवून आणलेली .त्या बातमीने मला वाईट वाटलं होतं. त्यांच्या हत्येनं आपण नेमकं काय गमावलं याची जाणीव लीडर पुस्तकातून झाली.
आर्थिक, शारीरिक, मानसिक झळा सोसून खस्ता खाऊन कार्यकर्ते देह झिजवतात, वेळ खर्ची करतात.
समाजाचं भलं व्हावं, शोषणापासून मुक्ती व्हावी यासाठी त्याग करण्याची ही प्रेरणा कुठून येते ? बदल घडताना दिसत नाहीये, राजकीय यश मिळत नाहीये, तरी कार्यकर्ते थांबत कसे नाहीत? निराश, हताश कसे होत नाहीत?
या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लीडर मध्ये मिळतील.
ज्याच्याकडे विद्याबळ, अधिकारबळ, द्रव्यबळ नाही तो बहुजन हा विचार प्रमाण मानून कॉम्रेड गोविंद पानसरे सर 63 वर्षे सामाजिक जीवनात कार्यरत राहिले. कामगारांच्या हिताची बाजू घेऊन, त्यांचं संघटन करून ते भांडवलदारांशी लढले. घरकाम, मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या महिलांना संघटित केलं, हक्कासाठी लढायला शिकवलं.
शिवाजी कोण होता? हे पुस्तक लिहून खरा इतिहास समोर आणला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाला मदत केली, गांधी मैदानातील यज्ञाला संघटित विरोध केला, टोलमुक्ती, दारूबंदी साठी आंदोलन केलं ..... इत्यादी कामामुळे कॉम्रेड गोविंद पानसरे सर हे ब्राह्मण्यवादी सनातनी विचार धारेला अडथळा ठरू लागले.
सांस्कृतिक लढा लढताना बलिदानाची तयारी ठेवावी लागते. कॉम्रेड गोविंद पानसरे सर यांची ती नेहमीच होती आणि झालंही तसंच......... बहुजनांच्या उद्धारासाठी झटणारा विचारवंत, कृतिशील कार्यकर्ता सनातन्यांनी शरीर रूपाने संपवला.
आपल्याला भगतसिंगचा,कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा विचार पुढे न्यायचा आहे, शोषितांची बाजू घेऊन लढायचं आहे, सांस्कृतिक लढाई लढाईची आहे. यासाठी हे कृतिशील विचारवंत समजून घ्यावे लागतील. त्यासाठी लीडर हे पुस्तकं वाचणं अनिवार्य आहे.
कॉम्रेड गोविंद पानसरे माझ्या मनात जिवंत आहेत.
( कॉम्रेड तुमचं बलिदान व्यर्थ जाऊ देणारं नाही, लढाई सुरूच राहील...... लाल सलाम! )
💡पुस्तकातून
👉🏽“तत्त्ववेत्त्यांनी जगाचा अर्थ सांगितला, प्रश्न आहे तो जग बदलण्याचा"
👉🏽आपल्या अंगीकृत कार्यात लोकांचा सहभाग करून घेऊन विचारांची चळवळ केली पाहिजे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा